सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) उपक्रमात देशातील कंपन्यांकडून गेल्या सात वर्षांत एकूण १.२७ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले असून या निधीत अडीच पट वाढ नोंदवण्यात आली. २०१४-१५ मध्ये कंपन्यांनी खर्च केलेला १०,०६५ कोटी रुपयांचा निधी २०२०-२१ मध्ये २५,७१५ कोटींवर पोहोचला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या महाराष्ट्राला निधीमध्येही सिंहाचा वाटा मिळाला असून सात वर्षांत सर्वाधिक १८,६०८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे ‘सीएसआर’चा महाराष्ट्रच लाभार्थी असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
देशातील भूक, दारिद्र्य आणि कुपोषणासारख्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने खासगी क्षेत्राची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कंपनी कायदा २०१३ तील कलम १३५ हे उद्योगांची सामाजिक बांधिलकी उद्धृत करते. एप्रिल २०१४ पासून लागू झालेल्या ‘सीएसआर’मध्ये आरोग्य सेवा, शिक्षण, गरिबी आणि कुपोषण निर्मूलन, पर्यावरण, ग्रामीण विकासासह अन्य २९ सामाजिक, आर्थिक अंगांवर खर्च करता येतो. कंपन्यांना अनेक पर्याय उपलब्ध असले तरी त्यांनी निवडक समस्यांना प्राधान्य दिले. केंद्र सरकारच्या ‘सीएसआर’ संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली सात वर्षांतील आकडेवारी पाहता, शिक्षणासाठी सर्वाधिक २९ टक्के हिस्सा मिळाला असून कंपन्यांनी ३६,८१५ कोटी रुपये खर्च केला. त्या पाठोपाठ आरोग्य क्षेत्र २५,३९१ कोटींसह २० टक्के वाटा घेतला आहे. तर ग्रामीण विकासासाठी १२,३०० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. याच प्रमुख तीन क्षेत्रांमध्ये १० हजार कोटींपेक्षा जास्त पैसा खर्ची झाला असून ‘सीएसआर’मधील त्यांचा एकत्रित वाटा तब्बल ५९ टक्के आहे.
पर्यावरण, कुपोषण, गरिबी आणि दारिद्र्य, जीवनमान उंचावणे, केंद्र सरकारचे विविध निधी, स्वच्छता, कला व संस्कृती, व्यावसायिक कौशल्ये या क्षेत्रांना प्रत्येकी दोन हजार कोटींपेक्षा जास्त मदत मिळाली असून त्यांचा एकत्रित हिस्सा २९.४ टक्के आहे. उर्वरित क्षेत्रांचा वाटा नऊ टक्क्यांपेक्षा कमी असून तीन टक्के हिस्सा कोणत्या क्षेत्रात खर्ची करण्यात आला, याची माहिती कंपन्यांकडून सरकारला देण्यात आलेली नाही.
पाच राज्यांना एक तृतीयांश निधी
देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक असून ‘सीएसआर’मध्येही कंपन्यांनी राज्याला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना सीएसआरअंतर्गत खर्ची करण्यात आलेल्या एकूण निधीपैकी एक तृतीयांश वाटा आहे. या राज्यांत दिल्लीचा समावेश करण्यात आला तर हा हिस्सा ३६.६ टक्क्यांवर पोहोचतो.
ईशान्येकडील राज्यांकडे दुर्लक्ष
ईशान्य भारतातील राज्यांना केवळ १.४ टक्के निधी मिळाला असून आसामला वगळल्यास ही रक्कम केवळ ०.२७ टक्क्यांवर पोहोचते. स्वच्छ भारत, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी, नमामी गंगा यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांत एकूण ‘सीएसआर’च्या ३२.७ टक्के म्हणजेच ५१,०९३ कोटी रुपये देण्यात आले.
पंतप्रधान मदत निधीमध्ये सातपट वाढ
कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने सीएसआर धोरणात काही बदल केले असून २०२०-२१ ते २०२२-२०२३ पर्यंत लसीकरण, तात्पुरती कोविड केअर सुविधा, पायाभूत आरोग्य सेवा उभारणे, वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प, व्हेंटीलेटर्स आणि अन्य वैद्यकीय साधनांसाठी या क्षेत्रात सीएसआर वळवण्यास मुभा दिली होती. यामुळे २०१९-२०२० च्या तुलनेत २०२०-२०२१ मध्ये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये दुप्पट; तर केंद्र सरकारच्या अन्य निधींमध्ये तब्बल ६७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. पंतप्रधान मदत निधीमध्ये २०१४-१५ च्या तुलनेत सात पट वाढ नोंदवण्यात आली असून २२८ कोटींवरून २०२०-२१ मध्ये १,६७९ कोटींवर पोहोचला. आरोग्य आणि दारिद्र्य निर्मूलनात २०२०-२१ मध्ये अनुक्रमे ४७ आणि १९ टक्के वाढ झाली असून याच वेळी कला आणि संस्कृती, व्यावसायिक कौशल्य निधीमध्ये निम्म्याहून अधिक घट झाली.
सर्वाधिक निधी मिळणारी राज्ये (कोटींमध्ये)
महाराष्ट्र १८,६०८
कर्नाटक ७,१६१
गुजरात ६,२०५
तमिळनाडू ५,४४०
आंध्र प्रदेश ५,१०२
सर्वाधिक निधी मिळालेली क्षेत्रे (कोटींमध्ये)
शिक्षण ३६,८१५
आरोग्य सेवा २५,३९१
ग्रामीण विकास १२,३०१
पर्यावरण ७,८१७
दारिद्र्य, कुपोषण ६,६७६
टीप : हा अहवाल १६ जानेवारी २०२३ रोजी ‘सकाळ’ मुंबई आवृत्तीच्या पान दोनवर प्रसिद्ध झाला आहे.